कौरव आणि पांडवांमधील युद्ध सुरु होऊन आता जवळपास सोळा दिवस उलटून गेले होते.
सतराव्या दिवस उजाडला तसे पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. अर्जुनाने कर्णाचा पुत्र वृषसेना याचा वध केला होता. अर्जुनाला पुत्र वियोगाचे दु:ख काय असते हे कर्णाला दाखवून द्यायचे होते, कारण चक्रव्युह भेदण्यासाठी आत शिरलेल्या अर्जुनाच्या पुत्राला अभिमन्यूला देखील हाल हाल करून मारण्यात आले होते त्याचा राग अर्जुनाला होता. परंतु आपल्या पुत्राच्या मृत्यचे दु:ख कुरवाळीत न बसता कर्ण पुन्हा लढण्यास सज्ज झाला कारण त्याला दुर्योधनाला विजयश्री चे दिलेले आश्वासन पूर्ण करायचा भार होता. कर्ण अर्जुनाशी दोन हात करण्यासाठी युद्धभूमीवर सरसावला. इतक्यात अश्वसेना नाग नावाचा सर्प कर्णाच्या भात्यात शिरला. तो सर्प सूडाच्या द्वेषाने कर्णाच्या भात्यात शिरला होता. हा तोच सर्प होता ज्याची आई अर्जुनाने खांडवप्रस्थला लावलेल्या आगीत जळून मृत्यू पावली होती. त्या आगीतून अश्वसेना नाग कसाबसा वाचला होता. परंतु आपल्या आईच्या मृत्यूने तो फार व्यथित झालेला होता. आईच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी सर्पाने त्याचवेळी अर्जुनाचा नाश करण्याचा विडा उचलला. आता कर्ण आणि अर्जुनाच्या युद्धप्रसंगावेळी त्याला आयती संधी चालून आली होती. त्याने स्वत:चे रूप पालटले आणि बाणाच्या रुपात तो कर्णाच्या भात्यात जाऊन बसला. जेव्हा कर्णाने बाण काढण्यासाठी आपल्या भात्यात हात घातला असता त्याच्या हाती रूप पालटलेला अश्वसेना नाग आला. युद्धाच्या प्रसंगी ही बाब कर्णाच्या ध्यानी आली नाही. त्याने आपल्या धनुष्याला बाण जोडुन सरळ अर्जुनाच्या दिशेने सोडला.
अर्जूनाच्या रथाचा सारथी म्हणजेच भगवान कृष्णाच्या ही बाब लक्षात आली की समोरून आपल्या रोखाने येत असलेला हा बाण साधासुधा नसून त्यात काहीतरी वेगळे आहे. अर्जुनाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने नेहमीप्रमाणे चतुराईने आपल्या पायावर भार देत रथाचे चाक जमिनीच्या दिशेने झुकवले, ज्यामुळे रथ काहीसा वाकडा होऊन गेला आणि बाणाच्या रुपात अर्जुनाच्या दिशेने ठाव घ्यायला चाललेला अश्वसेना नाग सूड घेता-घेता राहिला.
अर्जुनाचे नशीब महाबलवत्तर म्हणून तो अर्जुनाच्या मुकुटाला किंचित घासून गेला. चवताळलेला अश्वसेना नागाने कर्णाकडे बाण पुन्हा मारण्याची विनंती केली,
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण
“तुझ्या शक्तिशाली धनुष्यामधून नेम धरून पुन्हा एकदा मला अर्जुनावर सोड . यावेळेस मी त्याचा प्राण नक्की घेईन.”
कर्णाने एखाद्या श्रेष्ठ योद्ध्याला साजेसे असे उत्तर त्याला दिले. कर्ण अश्वसेना नागाला म्हणाला की,
“धनुष्यातून निघालेला बाण पुन्हा आपल्या शत्रूवर चालवणे माझ्यासारख्या वीराला शोभत नाही, किंबहुना ते माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. तू तुझा सूड उगवण्यासाठी दुसरा कोणता तरी मार्ग शोधू शकतोस. मी युद्धधर्म सोडून असले कृत्य करणार नाही, मला मात्र क्षमा कर.”
कर्णाचा स्पष्ट नकार ऐकून अश्वसेना नाग स्वत:च अर्जुनाचा बळी घेण्यासाठी बाहेर पडला. परंतु अर्जुनाने त्याला आपल्या एका बाणातच ठार केले आणि अश्वसेना नाग आपले प्राण गमावून बसला.
वरील प्रसंग तत्त्वनिष्ठ दानशूर कर्णाचे दाखले देतो. समजा कर्णाने नाग अश्वसेनाचे ऐकून दुसऱ्यांदा बाण अर्जुनावर सोडला असता, तर कदाचित अर्जुनाचा अंत झाला असता. पण कर्णाने संधी चालून आली म्हणून आपल्या तत्वांचा त्याग केला नाही आणि आपली तत्वे काटेकोरपणे पाळली. त्याने धर्मानेच युद्ध लढण्याचा मार्ग अवलंबला……. त्यामुळेच महाभारतात कर्णाला एक महती प्राप्त झालेली आहे.
इतक्या कठीण प्रसंगी देखील युद्धधर्म आणि तत्वनिष्ठपणा यांचा आधार घेऊन वागणारा केवळ आणि केवळ एकच वीर असू शकतो तो म्हणजे श्रेष्ठ महारथी कर्ण होय !
Source