रणमर्द बाजीप्रभू देशपांडे.
हि कथा आहे शिवकाळातील.
हिरडस मावळातील सिंध गावाची फार मोठी आसामी. बापजादे नावाजलेले पैलवान, घरची परंपराच मुळी कुस्तीची . गावात बाजीप्रभू देशपांडे यांचा चारचौकी देशपांडे वाडा होता, त्या वाड्यात समृध्द घोड्यांची पागा होती..! पागेच्या मागच्या बाजूला बाजींनी तालीम बांधली होती.
शिवरायांनी मांडलेल्या स्वराज्याच्या खेळात बाजी सुध्दा सामील झाले होते, पण त्या आधी बाजी बांदल देशमुख सरकारांचे दिवान म्हणून होते, राजांनी रायरी सर करून फितूर चंद्रराव मोऱ्यांना ठार केले तेव्हा त्यांना बाजी हे सोनं सापडलं,
पण बाजी मनोमनी म्हणत असत कि राजे हे सोनं आधी मातीमोल होतं..तुमचा स्पर्श झाला आणि जीवनाचे सोने झाले.
राजाना तर रायरी जिंकल्यापेक्षा ‘बाजी’’ मिळाल्याचा आनंद झाला होता..!!
बाजीप्रभू देशपांडे स्वतः पहाटे ३ वा. उठत असत. पूर्वीचे लोक भल्या पहाटे आपला दिवस सुरु करत असे म्हणजे दिवसभराच्या कामाला जास्त तास मिळत असे. पशुपक्षी बघा आपला दिवस कसा भल्या पहाटे सुरु करतात अगदी तसेच. बाजींच्या पदरी शूर धिप्पाड पैलवानांची फौज होती. सर्वजन कसलेले पैलवान हो..सर्वच लढतीला उठत असत पहाटे.! बाजींचे थोरले बंधू फुलाजी हे तर कुस्तीचे अतिशय व्यसनी. ३ तास लढत झाल्याशिवाय त्यांचे मनच भरत नसे..!! तर हे देशपांडे कुटुंब कुस्तीचे अतिशय नादिष्ट्य ..!! बाजी स्वत लढत करत असत, नंतर ५ हजार जोराचा ठेका एका दमात मारत असत, तद्नंतर २ तास हात्यारांचा सराव. मग अंघोळ पाणी ..तद्नंतर शंभू-भवानीची यथासांग पूजा झाली कि मग २ शेर तुपातील शिरा न्याहारीला यायचा. त्यानंतर ५ शेर दुध पिउन मगच बाजी शिवरायांना भेटायला राजगडी रवाना होत असत…!
एवढा प्रचंड व्यायाम, आणि खुराक ..?
मग काय ..बाजींचे काम काय लहान सहान होते ? अहो, त्यांच्या एका हाकेत बारा मावळ भगव्याखाली जमा होत होता…माणसासारखी माणसच काय पण हत्ती घोडे सुध्दा त्याना वचकून असत..! सकाळचा व्यायाम, खुराक, पूजा झाली आणि दिवसभराचे राजकारण संपवून सायंकाळी सुध्दा कुस्ती खेळल्याशिवाय अन्नाचा कण मुखात जात नसे..!
आणि एके दिवशी ६ महिने सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकलेल्या राजांनी तांबड्या मातीत रंगलेली बाजींची फौज घेवून सिद्दीच्या वेढ्याबाहेर उडी मारली ..! आणि रक्ताची रंगपंचमी खेळून बाजींनी राजांना सहीसलामत वेढ्याबाहेर काढले.. ८ तास चिखल वाटेने, भर पावसात धावत येवून आणि पुढे ६ तास लढून. बाजी-फुलाजी या सख्या भावांनी राजांसाठी,माय्भूसाठी स्वताच्या देहाची चाळण होऊन सुध्दा ती खिंड सोडली नव्हती…तोफेंचे बार ऐकूनच तो देह ठेवला.
हि रग, हि जिद्द, हि तळमळ, हि रक्ताची उसळी.. हि मातृभूमीवर मरायची आग फक्त तांबडी मातीच देवू शकते..
त्याचसाठी हा आजच लेख….!
हे जे बाजी-फुलाजी किंवा अन्य मराठेशाहीचे असे मरायला तयार होत होते हि खरी शिवरायांच्या कार्याची पावती आहे. शिवछत्रपती जर खरे ओळखायचे असतील तर या नरवीरांच्या बलिदानातून ओळखावे. कोण तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही,
तर कोणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो..कोण मृत्युच्या पालखीत हासत हासत बसतो..तर कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंथरुणात झोपतो..!
यांचे हे असामान्य बलिदान हि शिवराय करत असलेल्या महान कार्याची खरीखुरी पावतीच होय..!
जयोस्तु महाराष्ट्र…
धन्यवाद
लेखन, पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.