भीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय आहे. या संदर्भात सामंजस्याची भूमिका घेऊन कुठलेही प्रक्षोभक भाष्य न करता सामाजिक सलोखा कायम राहील, याची दक्षता घ्यावी, असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.
भीमा-कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. यावेळी २०० वर्ष झाल्यानिमित्त तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. त्या ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी घेतला असावा. काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन तीन-चार दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत. पोलिसांनी याबाबत केसेस दाखल केल्या आहेत. मात्र बाहेरून आलेले लोक करून गेले आणि ज्यांचा काही संबंध नाही अशा स्थानिक ग्रामस्थांवर केसेस दाखल केल्या गेल्या अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.
त्यामुळे दोन-तीन दिवस आधीपासूनच इथे अस्वस्थतेचे वातावरण होते. लाखांहून अधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबतीत लगेच काळजी घेतली ते बरं झालं. नाहीतर त्याला जातीय स्वरूप आले असते. मृत्युमुखी पडणारा कुणीही असो.. पण हे प्रकरण चिघळू द्यायला नको. जे घडले त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरू न देण्याची भूमिका घ्यायला हवी.
घडलेला प्रकार शोभादायक नाही. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी सामंजस्याने व संयमाने कोणतेही प्रक्षोभक भाष्य न करता योग्य प्रकारे ही परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे, असे माझे आवाहन आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.