सहा नव्हे, ३६ खून केले; संतोष पोळचा न्यायालयात अर्ज
या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे.
वाईजवळील धोम येथील गाजलेल्या साखळी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष पोळ याने मी ६ नाही, ३६ खून केले असल्याचा अर्ज सातारा न्यायालयात सादर केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या अर्जानुसार त्याच्याकडे अधिक चौकशी करण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये पोळ आणि त्याची साथीदार ज्योती मांढरे यांनी मिळून वाई तालुक्यातील धोम येथे सहा जणांचे साखळी पद्धतीने खून केल्याचे उघड झाले होते. याबाबत पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याविरोधात सातारा जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू असताना पोळ याने काही दिवसांपूर्वी आपण ६ नाही, तर ३६ खून केले असल्याचा अर्ज न्यायालयात सादर केला. त्याच्या या अर्जामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अर्जावर गुरूवारी न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी पोलिसांनी पोळ याच्या या नव्या अर्जानुसार त्याची फेरचौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.