अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी मान्य न करता अर्णब आणि सोबतच्या दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी बुधवारी त्यांना अटक केली होती.
हे प्रकरण जाणून घेण्यासाठी खालील लेख वाचा
पोलिसांनी तिघांना सुद्धा पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयापुढे केली असता न्यायालयाने ही मागणी फेटाळत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडी का फेटाळण्यात आली?
या प्रकरणाचा फेरतपास करत असताना न्यायालयाची परवानगी न घेणे तसेच आत्महत्या प्रकरणात तिघांचा थेट संबध दाखवण्यासाठी प्रबळ पुरावा सादर करण्यात आलेले अपयश या प्रमुख कारणांचा दाखला देत न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अर्णब चा पोलिसांकडून मारहाणीचा आरोप

अर्णब गोस्वानी यांना अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला. यावर त्यांची फेरवैद्यकीय तपासणी करण्यात आली, फेरवैद्यकीय तपासणी अहवालानंतर हा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला.
कोर्टात काय घडले?
अर्णब गोस्वामी यांचे वकील गौरव पारकर, फिरोज शेख यांचे वकील निहा राऊत, नितेश सारडा यांचे वकील सुशील पाटील यांनी कोर्टात त्यांची बाजू मांडली. त्यात वकिलांनी सांगितले की, पोलिसांनी यापूर्वी तपास पूर्ण केला असून यात काहीही निष्पन्न झाले नाही, तसा अहवाल पोलिसांनी आधी सादर केला आहे. तो न्यायालयाने तो मान्य केला होता. आता पोलीस अहवाल मागे घेत पोलिसांनी फेरतपासणी ची मागणी केली आहे, परंतु याला अजून कोर्टाने मान्यता दिलेली नाही. फेरतपासणीची परवानगी नसताना ही अटक केल्याने ही अटकच बेकायदेशीर आहे असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला.
सरकारी अभियोक्ता म्हणून वकील रुपेश महाकाळ हे सरकारची बाजू मांडत होते. या प्रकरणाच्या फेरतपासात काही नवीन मुद्दे समोर आले आहेत. त्यांचा तपास करायचा आहे. मागील तपासात काही त्रुटी राहून गेल्या असल्याने साक्षीदारांना तपासण्यासाठी आरोपीची चौकशी करणे गरजेचे आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे तपासायची आहेत त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे असे सरकारी वकील रुपेश महाकाळ म्हणाले.
या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी तिन्ही आरोपींची पोलीस कोठडीची मागणी फेटाळत १४ दिवस न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले.
कोर्टाचे निरीक्षण
आरोपीं ची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुरावा हवा. पोलीस कोठडीसाठी योग्य संयुक्तिक आणि सबळ कारण देता आली नाही. केसचा फेरतपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही, अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू या घटनेशी आरोपींचा थेट संबंध सिद्ध करायला पोलीस पुरावा सादर करू शकले नाहीत.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- “तुझ्या अंगावर वर्दी आहे म्हणून…,” १८ वर्षाच्या तरुणाची पोलिसांना शिवीगाळ
- पुण्यातील गडकिल्ले पर्यटकांसाठी खुले, हे आहेत नियम