सीबीएसई फेरपरिक्षेला विद्यार्थ्यांनी बसू नये, मनसेचे पालकांना सहकार्याचे आश्वासन: राज ठाकरे
सीबीएसई बोर्डाचा पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची लागणार या सरकारच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. फुटलेल्या पेपरची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका करत सरकारच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगावी असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांना समर्थन दिले आहे.
राज ठाकरे यांचे विद्यार्थ्यांना पत्र:
“सस्नेह जय महाराष्ट्र,
सीबीएसईच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षे आधीच फुटल्या, हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं?
माझं देशभरातील पालकांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करेल. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, उभी राहील.”

राज ठाकरेंनी पालकांना केलेले हे आवाहन पालक पाळतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, मनसे यास कसा पाठिंबा देणार हेही पाहावे लागेल.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.