माझा मृत्यू होताच माझे प्रेत शक्यतो विद्युत चितेवर जाळन्यात यावे. जुन्या पध्दतीप्रमाणे माझे प्रेत शक्यतो माणसांनी आपल्या खांद्यावर वाहून नेऊ नये. किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत स्मशानात नेले जावे. विद्युत स्मशानातील सभागारात कोणास पाहिजे तर वेदमंत्र म्हणावेत, भाषणे करावीत, माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेऊ नयेत.
कारण ज्यांना दु:ख होईल त्यांनीसुध्दा अशाप्रकारे निदर्शन केल्याने त्या आंशिक हरताळाने सुध्दा समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनीक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. जर कोणाला दु:ख वाटले आणि त्याचे काहीतरी निदर्शन करावसे वाटले तर त्यांनी एखादी सभा घ्यावी, नी वाटल्यास आपला शोक व्यक्तवावा. माझ्या निधनाविषयी कोणीही सुतक, विटाळ किंवा ज्यायोगे कुटुंबियांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अशा कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत किंवा पिंडप्रदान, त्या पिंडांना काकस्पर्श होइतो वाट पहात बसणे ईत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत. जर कोणाला माझ्या निधनानिमित्त नव्या अर्थी श्राध्द म्हणून दानधर्म करावासा वाटला तर तो कोणत्या तरी लोकांना प्रत्यक्ष लाभदायक आहे अशा हिदुत्वनिष्ठ संस्थांना दानधर्म करावा.
१ ऑगस्ट १९६४
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर