नुकतेच सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त भाजपा सरकारने सर्वत्र जाहिरातबाजी करत विकास करत असल्याचा मोठा फुगा केला. पण एक शेतकऱ्याने त्यांच्या हा फुगलेला फुगा फोडला आहे.
‘मी लाभार्थी’ नावाखाली आपला फोटो टाकून त्याखाली चुकीची माहिती टाकल्याची तक्रार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातल्या शांताराम कटके यांनी केली आहे. त्यांची अवस्था ‘पोस्टर बॉयज’ या चित्रपटातील नायकांसारखी करुन ठेवली आहे. त्यांच्या नकळत त्यांचा फोटो जाहिरातीत टाकून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
घटना अशी की सरकारच्या जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मिळालेल्या 2 लाख 30 हजार रुपयांच्या मदतीमुळे शेततळं बांधलं आणि शेतकऱ्याचं आयुष्य सुखकर झालं, अशी ‘मी लाभार्थी’ची जाहिरात आहे. शांताराम कटके यांचा फोटो असलेल्या जाहिराती पेपरात झळकल्या. पण यासाठी त्यांची विचारणाही केली नव्हती. वर्तमानपत्रात ही गोष्ट छापून आल्यानंतर शांताराम कटकेंना धक्काच बसला.
त्यातच कळस म्हणजे शांताराम कटके यांना मिळालेले शेततळे हे आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाले होते.
मनरेगा योजनेअंतर्गत 3 जुलै 2014 रोजी शांताराम कटके यांच्या शेततळ्याला मान्यता मिळाली आणि फेब्रुवारी 2015 मध्ये ते बांधून पूर्ण झालं. शेततळ्यासाठी त्यांना 1 लाख 30 हजार रुपये मिळाले. तर त्याला लागणाऱ्या कागदासाठी 45 हजार रुपये जमा झाले.
त्यानंतर गावातील अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केले परंतु त्यांना शेततळे मंजूर झाले नाही. काही शेतकऱ्यांनी स्वखर्चातून शेततळी उभारली.
भागातील कृषी अधिकारी यांनी सुद्धा कटके यांच्या दाव्याला दुजोरा देत 2 लाख 30 हजार रुपये मिळाल्याचे वृत्त खोटे असल्याचे बोलले.
‘मी लाभार्थी’ नावाखाली शेतकऱ्याची सरकार कडून फसवणूक ?
