नोकरी म्हणजे एक मरतुकडी गाय…..
चीनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसह प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला.
त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते व गवताचे एक पानपण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जीर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली.
या अशा ओसाड प्रदेशात कोण राहात असावे या कुतूहलाने ते त्या झोपडीजवळ गेले.
तेथे त्यांना एक मध्यमवयीन चिनी जोडपे, त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडी गाय दिसली. तुमचे कसे भागते? गुरूंनी त्या चिनी माणसाला विचारले.
त्याने त्या मरतुकड्या गाईकडे बोट दाखवले व म्हणाला, ही गाय रोज आम्हाला थोडे थोडे दूध देते. यातील काही दूध आम्ही वापरतो.
उरलेल्या दुधाचे दही करून त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावात जाऊन विकतो. त्याचे जे काही थोडेफार पैसे मिळतात त्यातून इतर गरजेच्या वस्तू आणतो.
आमचे कसे तरी भागते.
गुरू टेकडी उतरून खाली आले व आपल्या शिष्यांना म्हणाले, ताबडतोब ती मरतुकडी गाय मारून टाका. गुरूंची ही आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले.
ज्या गाईवर त्या माणसाचे जीवन चालू आहे, त्या कुटुंबाला रोजीरोटी मिळते आहे ती गाय मारून टाकायची? शिष्यांना वाटले, आपले गुरू किती निर्दयी व निष्ठुर आहेत.
कोणी शिष्य गाय मारायला तयार होईना. शेवटी हे काम गुरूंनी स्वतःच करायचे ठरवले. बोला, माझ्याबरोबर कोण येणार आहे? त्यांनी शिष्यांना विचारले.
कसाबसा एक शिष्य तयार झाला. त्या रात्री गुरू त्या शिष्याला टेकडीवर घेऊन गेले, त्या मरतुकड्या गाईला टेकडीवरून खाली ढकलले व गाय मेल्याची खात्री करून घेऊन परत आले व आपल्या शिष्यांबरोबर पुढच्या प्रवासाला लागले.
त्यांच्याबरोबर जो शिष्य गेला होता त्याला फार वाईट वाटू लागले. गुरूंनी जे केले ते पाप होते व त्या पापामध्ये आपणपण भागीदार होतो असे वाटून त्याच्या मनात शरमेची भावना निर्माण झाली. काही वर्षे त्याने ही भावना दाबून ठेवली, पण एक दिवस या भावनेचा उद्रेक झाला. त्या कुटुंबाचे काय झाले हे पाहण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.
गुरूला न कळवताच तो त्या झोपडीच्या ठिकाणी आला.तेथे आल्यावर त्या शिष्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट झाला होता.
झोपडीच्या जागी एक आधुनिक, टोलेजंग बंगला उभा होता. बंगल्याच्या बाहेर अनेक आधुनिक मोटारी उभ्या होत्या. बंगल्याभोवती सुरेख बगिचा केला होता.
सगळीकडे हिरवळ होती व काही शेतेपण दिसत होती. शिष्याला वाटले आपण चुकीच्या ठिकाणी आलो. त्याने तिथल्या एका माणसाला विचारले, माफ करा,
मी काही वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा हा भाग ओसाड होता. वरती टेकडीवर एक झोपडी होती. आता त्या झोपडीतील माणसे कुठे असतात?
तुमचे म्हणणे बरोबर आहे, त्या माणसाने उत्तर दिले. त्या झोपडीतील माणसे इथेच म्हणजे त्या बंगल्यात राहतात. हा त्यांचा बंगला आहे.
आज त्यांच्याकडे एक कार्यक्रम आहे.
आश्चर्य वाटून तो शिष्य टेकडी चढून बंगल्यापाशी आला.
त्याने पाहिले की, तोच चिनी माणूस व त्याची बायको एका भव्य सोफ्यावर बसले आहेत व त्याची तीन तरुण मुले उत्साहाने सगळ्यांचे स्वागत करत आहेत.
तो शिष्य त्या बंगल्यात गेला व त्या चिनी माणसाला म्हणाला, काही वर्षांपूर्वी मी माझ्या गुरूंबरोबर येथे आलो होतो. त्या वेळी तुम्ही एका मोडक्या, जीर्ण झालेल्या झोपडीत तुमच्या तीन मुलांबरोबर राहात होतात. तुमच्याकडे एक हडकुळी गायपण होती.
अगदी बरोबर आहे. तो चिनी माणूस उत्तरला. एका रात्री आमची गाय टेकडीवरून खाली पडली व मेली. आमचा तर आधारच हरपला. जगायचे कसे,
हा प्रश्न उभा राहिला, कारण तोपर्यंत आम्हाला गायीच्या दुधावरच जगायची सवय होती. जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. हळूहळू आमच्या असे लक्षात येऊ लागले की, आमच्याकडे अनेक कौशल्ये आहेत जी आम्हाला ठाऊक नव्हती. आम्ही त्या कौशल्यांचा विकास करायला सुरुवात केली, उद्योग-व्यवसायात पदार्पण केले.
हे तीन तरुण माझी मुले आहेत. तुम्ही याचे परिणाम बघताच आहात. जर आमची गाय मेली नसती तर हे घडले नसते.
आता त्या शिष्याला कळले की गुरू ती गाय मारायला का सांगत होते. त्याला आपल्या गुरूंच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले व गुरूंसाठीचा आदर कित्येक पटीने वाढला.
अनेकांच्या आयुष्यात अशीच एक गाय असते ज्याला ‘नोकरी’ असे म्हणतात. अनेकांची नजर या अशा गायीवरच असते. या गाईचे जे दूध मिळते (म्हणजे पगार मिळतो) त्यावर भागवण्याची सवय लागते. कोणाच्या नशिबात धष्टपुष्ट गाय येते तर काहींना किरकोळ गाय मिळते तर काहींच्या नशिबात अशी गायच नसते.
Credits: Business Guru
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
ऐतिहासिक वाचण्यासाठी:
शिवजयंती सोहळा: शिवराय आणि त्यांचे आधुनिक मावळे