शेतकऱ्यांना सवलती का द्याव्यात, कर्जमाफी का द्यावी? आताच्या काळात १५-२० % टक्के कर भरणाऱ्यांनी आणि तोही वाचवण्यासाठी खोटी कागदपत्रे जोडून धडपड करणाऱ्यांनी आवर्जून वाचावे…
गेली शेकडो वर्षे शेतकऱ्यांनी देशाचा प्रमुख उत्पन्नधारक म्हणून (उत्पन्नाच्या ५ भागातले २ भाग सरकारात प्रमाणे ) ४०% कर भरला आहे . याच शेतकऱ्यांनी युध्दस्थितीत सैन्यासाठी, रयतेसाठी आपली धान्याची कोठारे खुली केली आहेत. याच शेतकऱ्यांनी अनेक सत्ताधीशांनी दावा केलेल्या गुजरात, बेरार, माळवा या सारख्या भागात ६०% सुद्धा कर भरलेला आहे.
औरंगजेब दक्खनेत अफाट सैन्य घेऊन उतरायला आणि मोठा दुष्काळ पडायला अशी दुहेरी संकटे स्वराज्यावर कोसळली, एक वेळ जेवणासाठी प्रजा तरसत होती अश्या वेळी छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वात जिंजीहून १५००० बैलगाड्या भरून अन्नधान्याचा नियमित पुरवठा महाराष्ट्रात तेथील शेतकऱ्यांनी केला आणि महाराष्ट्र शब्दशः ‘जगवला’.
ज्या धोरणांचा मुख्यमंत्री गेली २ वर्षे अभ्यास करतायेत ती धोरणे शिवरायांनी ३५० वर्षांपूर्वीच राबवली होती –
१. कर्जमाफी – जो शेतकरी अपेक्षित उत्पन्न न आल्याने अथवा नुकसानी झाल्याने ग्रस्त आहे त्याला कर्जमाफी द्यावी असे आदेश शिवरायांनी सरकारात दिले होते – “कुलबी(शेतकरी) मोडून निकाम झाला, ऐसी जे बाकी रयतेवर असेल ते कुलाचे कुल माफ करावया साहेबास सांगणे, अमकी एक बाकी मफलीस (गरीब) कुलास माफ केली आहे समजावणे”
२. बिनव्याजी कर्ज – “पैके वाढी धीडी न करता मुदलच उसनेच हळूहळू याचे तवानगी माफिक घेत घेत उसूल करावा. जोवर त्याला तवानगी येईल तोवरी वागवावे” म्हणजे सरकारातून बिनव्याजी कर्ज द्यावे, शेतकऱ्यांच्या सवडीने हफ्त्याहफ्त्याने घ्यावे असे आदेश राजांनी अधिकाऱ्यांना दिले होते
३. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि शेतीला चालना देण्यासाठी मोठी तरतूद – ज्याला शेतीची कुवत आहे पण बैल नाही नांगर नाही अश्यांना रोख मदत राजांनी दिली “ज्याला जोतास बैल नांगर, पोटास दाणा नाही तरी त्याला दो चौ बैलाचे पैसे रोख द्यावे”
तसेच या योजनेसाठी म्हणजे कुणबी समर्थ करण्यासाठी २ लाख लारींची (चांदीच्या नाण्यांची) तरतूद छत्रपतींनी केल्याची नोंद आहे.
४. हमीभाव आणि नुकसान भरपाई – शाहू छत्रपतींच्या सुरुवातीच्या काळात आणि ताराराणींच्या काळात मोगल – मराठे यांच्यात प्रचंड युध्द होऊन बेरार विदर्भ भागात शेतीचे नुकसान झाले. शाहू महाराजांनी अधिकार्याकर्वी बेचिराख मुलखाची पाहणी करून मोठी भरपाई तेथील शेतकऱ्यांना दिलीच यावर त्यांच्या पुढील उत्पन्नावर कोणतेही कर लावले नाहीत.
शेतकऱ्यांना हमीभाव देताना मोबदला हा बाजारमुल्याहून अधिक असावा हा दंडक होता, अधिक उत्पन्नामुळे बाजारभाव घटल्यास हमीभाव ठरवून मधली तुट छत्रपती सरकारातून शेतकऱ्यांना देत असत. शेतकरी हा स्वराज्याचा कणा होता स्वराज्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत होता, ज्यांच्या जीवावर शेकडो वर्षे रयत जगली. त्या शेतकऱ्यांचीच कुचेष्टा अनेक लोक सोशल मेडियावर करत आहेत.
वेतन आयोग आला ‘वेतनहमी’ मिळाली, २.५ लाखापर्यंत कर नाही म्हणजे ‘सवलत’ मिळाली. तेव्हा शेतकरी कधी बोट मोडताना दिसला नाही…मग शेतकऱ्यांच्या कर्जामाफिला तुमच्या पोटात का दुखतंय?
या लोकांच्याच पूर्वजांना या शेतकऱ्यांनी एके काळी दुष्काळाच्या खाईत असताना मोफत धान्य वाटून जगवलेल आहे. या शेतकऱ्यांच्या कररुपी पैश्यातून मध्ययुगीन हिंदुस्तान उभा राहिला. रुग्णालये, धरणे, दवाखाने, रस्ते यासाठी जमिनी यांच्याच लुटल्या गेल्या. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जुन्या देवस्थानांचे आश्रयदाते हेच शेतकरी होते हे सुद्धा आजचे कृतघ्न लोक विसरले याहून ते दुर्दैव काय.
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
बाजीप्रभू देशपांडे तांबड्या मातीतील रणमर्द..