नागपुर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली आज मंगळवारी विधानभवनावर मोठया ताकतीनिशी विरोधकांचा मोर्चा धडकणार आहे. तशी संपूर्ण तयारी झाल्याची माहिती विरोधी पक्षांनी दिली असून मोर्चानंतर सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची जान येईल असा उद्देश या मोर्चाचा आहे. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि विषारी कीटकनाशकांमुळे गेलेल्या बळींच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या घटकपक्षांनी या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन आज केले असून सर्व महाराष्ट्राचे त्यावर लक्ष लागले आहे.
केंद्र आणि राज्य सरकार गेल्या तीन वर्षांत सर्वच बाजूंनी अपयशी ठरले आहे, नुसत्या भूलथापा देऊन सरकार चालत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. शेतकरी ते कामगारांपासून तरुणांपर्यंत कोणीही समाधानी नाही. सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे जनतेत संतापाची लाट आहे. या संतापाला वाचा फोडण्याचे काम जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून साधण्याचा विरोधक प्रयत्न करतील. काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते गुलाम नबी आझाद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. सकाळी १२ वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते दीक्षाभूमीजवळ एकत्रपणे येऊन मोर्चाला सुरुवात होणार आहे.
सरकार यावर किती लक्ष देते आणि काय पाऊले उचलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…
@PuneriSpeaks
News Source