राज्यात जवळपास ३९ हजार शेतकऱ्यांकडे सुमारे २२ हजार कोटी रुपयांची कृषीपंपांची विजबिलाची थकबाकी झालेली आहे. शेतकऱ्यांना खायला पैसा नसताना सरकारला पैसे देणार कुठून असा प्रश्न शरद पवार यांनी हल्लाबोल मोर्चाला संभोधताना सरकारला विचारला.
राज्य सरकार शेतकऱ्यांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी नवनवीन मार्गाचा अवलंब करीत आहे, शेतकऱ्यांना दडपून त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. ‘संपूर्ण कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांचा सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत सरकारचे एकही देणे पुरते करू नका’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांना आदेश देत राज्य सरकारची चोहोबाजूने कोंडी केली. दमबाजी करत माध्यमातून किंवा तुरुंगात टाकून हा उसळलेला जनआक्रोश दाबून टाकण्याची भाषा मुख्यमंत्री करत असतील तर त्यांचे सरकारच उलथवून टाकू, असा सज्जड इशाराच शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची नुसती फसवणूक चालली आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत वीज बिल थकबाकी, चालु बिल, सोसायटय़ांची राहिलेली देणी आणि इतर कोणत्याही प्रकारची देणी भरू नका, सरकारला त्यांच्या नाकर्तेपणाचा धडा शिकवा, सरकारशी असहकार करत त्यांची कोंडी करा अशी चिथावणी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केली.
नागपूर मध्ये सर्व विरोधी पक्षीय नेत्यांनी सरकार विरोधात विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढला होता, तेव्हा आपल्या वाढदिवशी मोर्चाचे नेतृत्व करताना मा. शरद पवार यांनी सरकारला सज्जड दम दिलेला आहे.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद् मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर ‘पाकिस्तान बरोबर मिळून भाजप चा पराभव करत आहेत’ या आरोपांवर बोलताना शरद पवार म्हणाले की ‘नरेंद्र मोदी यांना लाज वाटली पाहिजे’, मनमोहन सिंग यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
News Source
शेतकऱ्यांनी सरकारची देणी देऊ नका, दमबाजी कराल तर सरकार उलथवून टाकू…. शरद पवार यांचा राज्य सरकारला सज्जड दम
