30, ऑक्टोबर 2017
महाराष्ट्र, मुंबई : मागील तीन वर्षांत फडणवीस सरकारने केलेल्या केवळ घोषणाबाजी आणि त्यातुन सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, नोकरदार आणि इतर वर्गात निर्माण झालेल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आजपासून राज्यात जनआक्रोश आणि जनजागृती आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
येत्या 8 नोव्हेंबरपर्यंत हे आंदोलन चालणार असून याच दिवशी नोटांबंदीचे राज्यभरात वर्षश्राद्ध घातले जाणार
राज्याच्या प्रत्येक तालुका, जिल्ह्यातील मोठी गावे आदी ठिकाणी राष्ट्रवादीकडून सरकारविरोधात हे जोरदार आंदोलने छेडली जाणार असून त्याची सुरुवात आज नाशिक, माराठवाड्यात औरंगाबाद आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली. तर उद्या ठाण्यात सरकारविरोधात मोठे आंदोलन छेडले जाणार आहे.
सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावाखाली आतापर्यंत फसवले आहे, तर दुसरीकडे नोटाबंदीनंतर लाखो जणांचा हातून रोजगार गेला असल्याने जनतेच्या मनांत सरकारविरोधात प्रचंड आक्रोश आहे. सरकार मागील तीन वर्षात पूर्णपणे अपयशी ठरले असून त्याविरोधात राष्ट्रवादीकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातील सरकारी कचेऱ्या समोर सरकारविरोधात येत्या 8 नोव्हेंबरपर्यंत आंदोलन केले जाणार आहे. तर 8 नोव्हेंबर रोजी नोटांबंदीने राज्यभरात वर्षश्राद्ध घातले जाणार असून यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक, महिला, विद्यार्थी विभागासह कामगार, विविध प्रवर्गाचे सेल प्रमुख आणि लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत
तर याच दरम्यान, कर्जत येथे पक्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची एक चिंतन बैठक होणार आहे.